हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 21/7/2026
दिल्लीतील जंतरमंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ 23 जुलैला वंचित बहुजन आघाडीचा "महाराष्ट्र बंद"
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात बंदची घोषणा, अभिजीत दीपके यांच्या CJP आंदोलनाला पाठिंबा.
पत्रकार / पूजा चव्हाण.
दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP संस्थेच्या "संसद चलो" आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
दिल्लीत 20 जुलै रोजी CJP संस्थेचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर एकत्र जमले होते. आंदोलनकर्ते शांततेने संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. त्यानंतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडल्याचे आरोप आंदोलकांनी केले आहेत.
CJP चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत "12 वर्षांच्या मुलींचे डोके फोडले, महिलांचे कपडे फाडले" असा गंभीर आरोप केला आहे. तर दिल्ली पोलिसांनी कोणताही बळाचा वापर न केल्याचा आणि आंदोलन व्यावसायिकरित्या हाताळल्याचा दावा केला आहे. मात्र शशी थरूर यांनीही "शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज का?" असा सवाल उपस्थित केला आहे. 9dc8dbbef42d
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा निषेध नोंदवला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, देशभरातील तरुणांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे 23 जुलै रोजी महाराष्ट्रभर शांततापूर्ण बंद पाळण्यात येईल.
*बंद दरम्यान काय बंद राहणार?*
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या माहितीनुसार बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्ष कार्यकर्ते राज्यभर विविध ठिकाणी निदर्शने करणार आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, "जेव्हा देशाचा युवा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा सरकारने अहंकार सोडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. लाठीचा वापर हा लोकशाहीचा अपमान आहे."
CJP हे आंदोलन NEET पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततांच्या विरोधात करत आहे. आंदोलकांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
23 जुलैच्या बंदला यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.


