हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 7/6/2026
"झाडे लावा, वसुंधरा वाचवा! अनिरुद्ध बापूंच्या 'वन दुर्गा योजने'तून पनवेलच्या आदई जंगलात ५२ हजार सिडबॉल्सची लागवड; वाडा-मोखाड्यातही १ लाखांचा संकल्प"
पत्रकार / पूजा चव्हाण.
पनवेल, 5 जून 2026 (प्रतिनिधी) शहरीकरणाच्या रेट्यात हरवत चाललेली हिरवाई परत आणण्यासाठी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनने 'वन दुर्गा योजना' अंतर्गत सिडबॉल्स सेवेचा वसा घेतला आहे. येत्या रविवार, 14 जून रोजी पनवेल तालुक्यातील आदई जंगल परिसरात सीसमच्या 52,000 बिया तसेच आंबा, फणस, जांभूळ, करवंद यांसह विविध देशी वृक्षांच्या बियांची सिडबॉल्सद्वारे लागवड केली जाणार आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातील वाडा व मोखाडा तालुक्यातही संस्थेतर्फे 1 लाखांहून अधिक सिडबॉल्स डोंगराळ व जंगल भागात रुजवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या भक्तिसेवेत शेणखत आणि लाल माती यांचे योग्य मिश्रण करून बियांचे गोळे तयार केले जातात. हे सिडबॉल्स पावसाळ्यापूर्वी डोंगरउतारावर व जंगल परिसरात फेकले जातात. पाऊस पडल्यावर नैसर्गिकरित्या हे गोळे फुटून बिया रुजतात आणि कोणत्याही मानवी देखरेखीशिवाय झाडे वाढतात. "शहरीकरणाच्या नावाखाली सर्रास झाडांची कत्तल होत आहे. काळाची गरज ओळखून पर्यावरण रक्षणासाठी ही 'सिडबॉल्स सेवा' अत्यंत महत्त्वाची आहे," असे संस्थेच्या श्रद्धावान स्वयंसेवकांनी सांगितले.
सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन तर्फे वर्षभर विविध भक्तिसेवांचे उपक्रम राबवले जातात. अनाथ, वृद्ध, दिव्यांग बांधवांसाठी अन्नदान, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत यांसह आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही दिले जाते. मात्र, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी 'वन दुर्गा योजना' ही विशेष सेवा म्हणून राबवली जाते. श्री अनिरुद्ध बापूंच्या 'भक्तिभाव चैतन्य' या शिकवणुकीनुसार निसर्गसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून हजारो श्रद्धावान भक्तिमय भावने या उपक्रमात सहभागी होतात. संस्थेचे 'अल्फा टू ओमेगा' हे मासिक न्यूजलेटर या सर्व सेवांची माहिती भक्तांपर्यंत पोहोचवते.
गेल्या काही वर्षांत संस्थेने महाराष्ट्रातील अनेक डोंगराळ भागात लाखो सिडबॉल्सची लागवड केली आहे. यंदा आदई जंगलातील 52 हजार व वाडा-मोखाडा भागातील 1 लाख सिडबॉल्सच्या माध्यमातून स्थानिक जैवविविधता वाढवणे, जमिनीची धूप थांबवणे व भूजल पातळी वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. सीसम सारखी कमी पाण्यात वाढणारी, तर आंबा, जांभूळ, फणस यांसारखी फळझाडे लावल्याने वन्यजीव व पक्ष्यांना नैसर्गिक अन्नही उपलब्ध होणार आहे.
"वृक्षारोपण करून फोटो काढण्यापेक्षा हजारो बिया निसर्गाच्या स्वाधीन करणे अधिक परिणामकारक आहे. एक सिडबॉल म्हणजे एका झाडाची शक्यता," असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेतून साकार होणारी ही 'वन दुर्गा सेवा' वृक्षतोडीने बोडक्या होत चाललेल्या डोंगरांना पुन्हा हिरवे कंच शालू पांघरण्याचे काम करत आहे. या सेवेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या निसर्गप्रेमींनी स्थानिक उपासना केंद्राशी संपर्क साधावा.


