हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/6/2026
नांदेडसह महाराष्ट्र ‘भेसळीच्या विळख्यात’! मस्तावलेल्या अन्नमाफियांची आता खैर नाही.
शेकडो कोटींच्या भेसळयुक्त साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी ‘सिंघम’ मुंढेंनी स्वतः नांदेडमध्ये उतरण्याची जनतेची आर्त हाक!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड.
नांदेड:दि.२ जून.
पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप नागरिकांच्या,लहान मुलांच्या ताटात थेट 'विष' वाढणाऱ्या मस्तावलेल्या अन्नमाफियांची आणि हॉटेलमालकांची नशा उतरवण्यासाठी अखेर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला 'थर्ड आय' उघडला आहे! गेल्या आठवडाभरात नांदेड जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात एफडीएने राबवलेली धडक मोहीम कौतुकास्पद असली, तरी हे तर केवळ हिमनगाचे टोक आहे.अनेक वर्षांपासून एसी केबिनमध्ये बसून 'मासिक आणि आठवड्याचे हप्ते' लाटणाऱ्या सुस्त,बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे आज महाराष्ट्रातील अनेक पिढ्या बरबाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक मार्गदर्शनाखाली नांदेडमध्ये मागील आठवड्यात कोट्यवधी रुपयांचा गुटखा, बनावट खाद्यतेल आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त करून दुकाने सील करण्यात आली आहेत.मात्र, केवळ १-२ टक्के कारवाई करून भागणार नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या नराधमांना आता थेट जेलमध्ये पाठवून खडी फोडायला लावण्याची वेळ आली आहे!
... *पण ही कारवाई शंभरातून फक्त दोन टक्के! 'हप्तेखोर' अधिकाऱ्यांमुळे समाज बरबाद!*
मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त मुंढे यांनी पदभार घेताच सुस्त अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवर रोज कारवाईच्या बातम्या येत आहेत,हे चित्र सुखावणारे असले तरी राजकारणी आणि लोकप्रतिनिधींचे हितसंबंध पाहता, मुंढे साहेबांना या पदावर हे भ्रष्ट नेते टिकू देतील का? हा मोठा प्रश्न आहे.
आज गल्लीबोळातील पानटपऱ्यांपासून ते थेट पोलीस ठाण्याच्या समोर सर्रास गुटखा विकला जातो. महाराष्ट्रात गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे का? प्रत्येक तालुक्यात प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने ड्युप्लिकेट गुटखा बनवण्याचे कारखाने आणि गोदामे सुरू आहेत.
अनेक वर्षांपासून एसी केबिनमध्ये बसून दरमहा लाखो रुपयांचे हप्ते गोळा करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या काही लाचखोर अधिकाऱ्यांमुळे आज लहान मुले आणि तरुण पिढी अंमली पदार्थ आणि बनावट गावठी दारूच्या आहारी जात आहे.
*हॉटेलचे किचन की डुकरांचा वाडा? 'ब्रँडेड' नावाखाली ग्राहकांना थेट 'धोका'!*
नांदेडमधील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची विदारक स्थिती डोळ्यात अंजन घालणारी आहे
* घाणेरडे किचन्स आणि नो-पेस्ट कंट्रोल:
नांदेडमधील मोठ्या एअर कंडिशनर (AC) हॉटेल्सचे किचन्स अत्यंत घाणीत आहेत.भाजीपाला न धुता, त्याच कुबट आणि काळ्याकुट्ट झालेल्या तेलात वारंवार तळून पदार्थ ग्राहकांच्या पानात वाढले जातात.वेटर आणि आचारी यांच्याकडून स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत.
*
* दूध,पनीर आणि मिठाईत केमिकलचा महापूर: दुधाच्या डेऱ्यांमध्ये सर्रास भेसळ सुरू आहे.
*
मार्केटमध्ये मिळणारे पनीर आणि दूध हे सोयाबीन व घातक केमिकलपासून बनवले जात आहे. सणासुदीला मिळणाऱ्या खवा, लस्सी, मठ्ठा, दही यात १०० टक्के केमिकलची भेसळ आहे.
*
* कृत्रिम फळे आणि एक्सपायरी डेटचा घोळ: आंबे आणि केळी कृत्रिम वायू व रसायने वापरून पिकवली जात आहेत.
सुपरमार्केट्स आणि डी-मार्टसारख्या ठिकाणी पॅकिंग अन्नपदार्थांची 'एक्सपायरी डेट' पुसून त्यावर नवीन तारखा छापून शिळा माल लोकांच्या माथी मारला जात आहे.रेल्वे स्टेशनवर मिळणारे अन्न तर विषसमान झाले आहे.
*
* मिनरल वॉटरच्या नावाखाली नळाचे पाणी नांदेड शहरात गल्लोगल्ली मिनरल वॉटरच्या नावाखाली थेट नळाचे पाणी प्लास्टिक जारमध्ये भरून विकले जात आहे.
पाणी थंड करण्यासाठी कृत्रिम वायूचा (Gas) वापर करून लोकांची फुफ्फुसे आणि लिव्हर निकामी करण्याचे पाप हे व्यावसायिक करत आहेत.
*मुंढे साहेब,संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी;आता थेट जन्मठेपेचीच शिक्षा करा!*
इतकी वर्षे शांत बसलेल्या आणि जनतेच्या आरोग्याचा सौदा करणाऱ्या या मस्तावलेल्या व्यापाऱ्यांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आता गय केली जाऊ नये. जर नांदेड जिल्ह्याची एकाच दिवशी कसून चौकशी केली, तर शेकडो कोटी रुपयांचा बनावट आणि भेसळयुक्त साठा जप्त होऊ शकतो, इतका हा जिल्हा अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे.
जनतेचा थेट सवाल आमच्या पिढ्यान् पिढ्या आजारी पाडून,हॉस्पिटलची बिले भरायला लावून स्वतःचे बंगले आणि आलिशान गाड्या घेणाऱ्या या पाप्यांना जबाबदार कोण?
*महाराष्ट्रातील जनतेचा जाहीर इशारा*
आयुक्त तुकाराम मुंढे साहेब, तुम्ही जितके दिवस या पदावर आहात,तितके दिवस तुमची ही आक्रमक आणि धडक मोहीम अशीच सुरू ठेवा.अन्न भेसळ करून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या नराधमांना आता थेट जेलमध्ये पाठवून खडी फोडायला लावा! संपूर्ण महाराष्ट्रातील प्रामाणिक जनता आणि सजग नागरिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जर तुम्ही नांदेडवर विशेष लक्ष दिले आणि या अन्नमाफियांची नशा जिरवली,तर बरबाद होणाऱ्या लाखो लहान मुलांचे आणि कुटुंबांचे आयुष्य वाचेल आणि त्याचे सर्व श्रेय केवळ आणि केवळ तुमच्या धडाडीच्या नेतृत्वाला जाईल!


