हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 16/5/2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पेणमध्ये ‘छावा क्रांतीवर’चा दिमाखदार पालखी सोहळा; शंभूराजांना अभिवादन*
पत्रकार /पूजा चव्हाण.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ‘छावा क्रांतीवर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटन’ यांच्या वतीने पेण शहरात मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. संस्थेतर्फे जयंती उत्सवाचे हे पाचवे वर्ष असून यानिमित्त शहरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताका फडकावत व ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे’च्या जयघोषात छत्रपती संभाजी महाराजांची पालखी नगरपालिकेच्या दिशेने मार्गस्थ झाली. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत ही पालखी संभाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.
या पालखी सोहळ्यात ‘छावा क्रांतीवर’ संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र राम ठाकूर, जिल्हा सल्लागार दिलीप साळवी, जिल्हा वाहतूक अध्यक्ष वसंत पाटील, पेण तालुका महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई ठाकूर, तालुका सल्लागार राम हसव ठाकूर, तालुका उपशहर अध्यक्ष गिरीश म्हात्रे यांच्यासह विजय ठाकूर, शालिनी ठाकूर, राजश्री ठाकूर, दिपाली ठाकूर, हर्षाली ठाकूर, मयुरेश ठाकूर, हरिश्चंद्र कुथे, रुद्रा ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाहुणे म्हणून काँग्रेस महाराष्ट्र राज्य महासचिव नंदाताई म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व अक्षय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून, डोक्यावर गांधी टोपी व हातात भगवे ध्वज घेऊन पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पोलीस प्रशासनाने पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचे फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग व बलिदानाची आठवण करून देणारा व तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला. ‘छावा क्रांतीवर’ सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात. संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित पालखी सोहळ्याच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जपण्याचा व तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संस्थेने केला असल्याची भावना जिल्हाध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. शिस्त, उत्साह व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा हा जयंती सोहळा पेणकरांसाठी संस्मरणीय ठरला.




